Solar Krushi Pump: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी वीजपुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी वीजपुरवठा झाल्याने शेतकऱ्यांना अंधारात पिकांना पाणी देण्यासाठी धोका पत्करावा लागतो. यावर उपाय म्हणून सरकारने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना राबवत आहे . या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारे पंप कमी दरात उपलब्ध होतो , ज्यामुळे वीजबिलाचा खर्च वाचून , दिवसा सिंचनाची सोय होते. पण,जर सौर कृषी पंपात बिघाड झाली तर शेतकऱ्यांना तक्रार कुठे आणि कशी करायची , याबाबत अनेकदा गोंधळ निर्माण होतो. यासाठी महावितरणने आता एक सोपी आणि प्रभावी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
सौर कृषी पंपात बिघाड? या समस्यांचे निराकरण शक्य
सौर कृषी पंपात खालील समस्यांपैकी कोणतीही समस्या उद्भवल्यास तक्रार नोंदवता येईल:
- पंप पूर्णपणे बंद पडणे
- सौर पॅनलची चोरी किंवा नुकसान
- कमी दाबाने पाणी येणे
- सौरऊर्जा संच चालू न होणे किंवा कार्यान्वित न होणे
तक्रार नोंदवण्याची सोपी पद्धत
महावितरणने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी सर्वात सोपा पर्याय म्हणजे महावितरण मोबाईल ॲपद्वारे तक्रार नोंदवणे. या ॲपवर तुम्ही वीजबिल तपासणे, मीटर रीडिंग नोंदवणे, ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीची माहिती देणे यासारख्या सुविधांसह आता सौर कृषी पंपाशी संबंधित तक्रारी देखील नोंदवू शकता.
मोबाईल ॲपवर तक्रार कशी नोंदवावी?
- महावितरण ॲप डाउनलोड करा: ॲप Google Play Store किंवा Apple App Store वर उपलब्ध आहे.
- लॉगिन करा: तुमचा लाभार्थी क्रमांक (Beneficiary ID) किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
- सौर पंप तक्रार पर्याय निवडा: ॲपमधील ‘Solar Pump Complaint’ पर्यायावर क्लिक करा.
- तक्रारीचा तपशील भरा: बिघाडाचे कारण आणि इतर आवश्यक माहिती नोंदवा.
- सबमिट करा: तक्रार सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक (Reference Number) मिळेल.
इतर तक्रार नोंदवण्याचे पर्याय
मोबाईल ॲपशिवाय खालील पर्यायांचा वापर करून तक्रार नोंदवता येईल:
पर्याय | तपशील |
---|---|
महावितरण वेबसाइट | https://www.mahadiscom.in/solar वर तक्रार नोंदवा. |
पुरवठादार कंपनीची वेबसाइट | ज्या कंपनीने पंप पुरवठा केला, त्या कंपनीच्या वेबसाइटवर तक्रार नोंदवा. |
टोल फ्री क्रमांक | १९१२, १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ वर कॉल करा. |
तक्रारीनंतर काय होते?
- तीन दिवसांत निराकरण: तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित पुरवठादार कंपनीला तीन दिवसांत समस्या सोडवणे बंधनकारक आहे.
- विमा संरक्षण: सौर कृषी पंप संचावर पहिल्या पाच वर्षांसाठी विमा संरक्षण आहे. यामुळे चोरी, तोडफोड किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी दावा करता येतो.
- सेवा केंद्र: कंत्राटदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सेवा केंद्र उभारणे बंधनकारक आहे, ज्यामुळे तक्रारींचे त्वरित निराकरण होईल.
- एसएमएस अपडेट: तक्रार निवारणानंतर शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती दिली जाते.
शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावे?
- लाभार्थी क्रमांक आवश्यक: तक्रार नोंदवायच्यावेळेस लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकणे गरजेचे आहे.
- विम्याची माहिती: नैसर्गिक आपत्ती किंवा चोरीच्या घटनेत तीन दिवसांत पंचनामा करून घ्यावा व पुरवठादाराला कळवावे. चोरीच्या बाबतीत नजीकच्या पोलीस ठाण्यात FIR दाखल करावी.
- पाच वर्षांची हमी: पंप बसवल्यापासून पाच वर्षांपर्यंत देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पुरवठादार कंपनीची आहे.
सावधान! बनावट कॉलपासून सावध रहा
महावितरणने शेतकऱ्यांना सावध केले आहे की, काही बनावट कॉल्स किंवा मेसेजद्वारे प्रतीक्षा यादी बदलून पंप लवकर बसवण्याचे आमिष दाखवले जाते. अशा कॉल्सना बळी पडू नका आणि कोणालाही पैसे देऊ नका. सौर कृषी पंप योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि ऑनलाइन आहे.
शेतकऱ्यांसाठी वरदान
‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही योजना शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरली आहे. सौर पंपामुळे शेतकऱ्यांचा वीजबिलाचा खर्च वाचतो आणि पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन मिळते. आता मोबाईल ॲपमुळे तक्रारींचे त्वरित निराकरण होऊन शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल. जर तुमच्या सौर पंपात काही समस्या असेल, तर आजच महावितरण ॲप डाउनलोड करा आणि तक्रार नोंदवा. तीन दिवसांत तुमची समस्या सुटेल!
2 thoughts on “Solar Krushi Pump: सौर कृषी पंप खराब झाला? आता घरबसल्या करा तक्रार ‘व’ मिळवा ३ दिवसात समाधान”